Friday, August 27, 2010

उत्तरकाशी - डोडीताल - यमुनोत्री ट्रेक

गेल्या आठवड्यात 'उत्तरांचल'मधला उत्तरकाशी - यमुनोत्री हा ५ दिवसाचा ट्रेक कंपनीमधील २१ जणांनी केला. गेल्या दोन महिन्यांपासून या ट्रेकची तयारी सुरु होती.

पहिला दिवस
१४ ऑगस्टला सारेजण पुण्याहून निघालो. विमानाने दिल्ली. माझा हा पहिलाच विमान प्रवास होता. तेव्हा पहिल्यांदाच समजले..की..

आकाश के उस पार भी आकाश है...



दिल्ली विमानतळावरून बस आणि मट्रोने प्रवास करून आम्ही जुन्या दिल्ली रेल्वे स्टेशनवर पोचलो. दिल्ली मेट्रोचे व्यवस्थापन अप्रतिम आहे.
जर तुम्ही जुन्या दिल्ली रेल्वे स्टेशनवर आहात आणि तुमच्याकडे ३-४ तासांचा वेळ आहे तर काय कराल?
फार विचार करू नका. इथून १० मिनिटांच्या अंतरावर 'पराठेवाली गली' आहे. आम्ही सरळ या 'गली'चा रस्ता धरला. इथे नाना प्रकारचे पराठे मिळतात. अगदी आलू, मेथीपासून पनीर, पापड, काजूपर्यंत..



जवळजवळ सगळ्या प्रकारच्या पराठ्यांवर ताव मारून आणि लस्सी पिऊन आम्ही लाल किल्ल्याकडे निघलो. १५ ऑगस्टमुळे किल्ला बंद होता. मग बस पकडून 'इंडिया गेट' गाठले.





रात्री ट्रेनने आम्ही हरिद्वारला गेलो.

दुसरा दिवस

हरिद्वार.



हरिद्वारला फार वेळ न घालवता सकाळीच आम्ही उत्तरकाशीची बस पकडली. हा घाटाचा रस्ता कापायला ६ तास लागतात. घाटातून कळू लागते की आपण निसर्गाच्या अगदी कुशीत शिरत आहोत.



इथे पाण्याला ओढ फार. अगदी साधा इवलासा ओढासुद्घा घनगंभीर आवाज करत असतो.
आणि ही तर खळाळणारी भागीरथी. खोल दरीमधूनही हिचा आवाज स्पष्ट कानी येत होता.



घाटात काही ठिकाणी दरडी कोसळल्या होत्या. त्यांचा पसारा बाजूला करून वाहतूक पुन्हा सुरु होत होती.



उत्तरकाशीला निसर्गाचे भरभरून वरदान मिळाले आहे. चहू बाजूंनी डोंगरांनी वेढलेले हे शहर म्हणजे दुसरा स्वर्गच आहे.



(पर्बतों के पेड़ों पर शाम का बसेरा है, सुरमई उजाला है, चम्पई अंधेरा है)



(दोनों वक़्त मिलते हैं दो दिलों की सूरत से, आस्मा ने खुश होके रँग सा बिखेरा है)



उत्तरकाशीला अनेक देवळेही आहेत. या गावाला काशीचे महत्व ज्यामुळे मिळाले ते हे विश्वेश्वराचे देऊळ. आत भव्य पिंड आहे.



याशिवाय विष्णू, हनुमान, परशुराम, राम यांची देवळेही पाहण्यासारखी आहेत.

तिसरा दिवस

आजपासून आमचा ५ दिवसांचा ट्रेक सुरु होणार होता. सकाळी लवकर आम्ही उत्तरकाशी वरुन 'संगमचट्टी'ला निघलो. साथीला भागिरथी होतीच...



आणि आता तर अंतरही कमी होते.



संगमचट्टीहून पुढे रस्ता नसल्याने गावातून पोर्टर व खच्चर भाडय़ाने घेऊन त्यावर सामान लादून खरा ट्रेक सुरू झाला. आपल्याजवळ असलेल्या पाठपिशवीमध्ये पाणी, टॉर्च, बिस्किीटे, रेनकोट व एक ड्रेस एवढे सामान आवश्यक असत. कारण, मध्येच कुठे दरड कोसळून अडकून पडल्यास मदत मिळेपर्यंत राहावे लागते. संगमचट्टीवरून ६ किमीचा ट्रेक करून आम्ही अगोडा या गावी पोचलो. वाटेत अनेक सुंदर ओढे/धबधबे लागले.



अगोड्याला जळवांचा त्रास फार झाला. प्रत्येकाच्या बूटांवर कमीतकमी ७-८ जळवा तरी निघाल्या. इथेच आम्हाला अजून एक नवा साथीदार मिळाला. नाव टायगर. :)



इथून पुढे पूर्ण ट्रेक संपेपर्यंत टायगर आमच्या सोबत होता.

चौथा दिवस

आज १४ किमीचा ट्रेक पूर्ण करून 'डोडीताल'ला पोचयचे होते. सकाळी मस्त धुके पडले होते.



अगोड्याहून डोडीतालला जाणारा रस्ता मात्र पक्क्या दगडांनी बांधलेला आहे. दुपारी डोडीतालला पोचलो तेव्हा पाऊस सुरु होता. डोडीताल सरोवरातून अन्नपूर्णा नदी वाहते.



डोडीतालच्या सरोवराचे काय वर्णन करावे? इतका सुंदर देखावा की देहभान हरपते.





सरोवराच्या सभोवती दगडी मार्ग आहे. याच्या वरून पूर्ण सरोवराला प्रदक्षिणा घालता येते.





काठावर अन्नपूर्णेचे देऊळ आहे.



या रमणीय प्रदेशानून पाय आणि मन दोन्ही हलत नव्हते. पण पुढे जाणे भागच होते.



पाचवा दिवस

आज सर्वाच उंच पॉईंट (दारव्हा टॉप)पर्यंत जायचे होते. दारव्हा टॉप ची उंची १३,५४६ फूट असून सभोवताल बर्फाच्छादित स्वर्गारोहणी, बंदरपुच्छ, ग्वाली हिमशिखरे आहेत. या सर्वात कठीण ट्रेकसाठी सकाळी निघून अन्नपूर्णा नदीच्या काठाकाठाने डोंगर चढण्यास सुरुवात केली.

अनेक ठिकाणी साखळी करून अन्नपूर्णा पार करावी लागते. टॉपवर थंडगार बर्फाचे वारे वाहत होते. खाली अद्भुत फुलांचे ताटवे, फुलले होते.



पण आता मात्र हळूहळू सगळ्यांना त्रास होऊ लागला. जास्त उंचीवर प्राणवायू कमी असल्यामुळे श्वास घेताना त्रास होत होता. किंचित डोके दुखु लागले, भूक गेली, हालचाल करण्यास त्रास होऊ लागला. वातावरण पावसाळी असल्याने बर्फाच्छादित हिमशिखरेही दिसत नव्हती. तेव्हा थोडे खाली येउन आम्ही तंबू ठोकण्याचा निर्णय घेतला. जागा तर पहा...





सहावा दिवस

आज सर्वात कठीण ट्रेक अनुभवायला मिळाला. आता एवढय़ा उंचावरून खाली हनुमानचट्टीकडे जायचे होते. या मार्गावरची पुढची कॅम्प साईट सीमा, १८ कि.मी. आहे. हिमशिखरांपासून बर्फ वितळून निघणाऱ्या नद्या व लहान मोठे प्रवाह, ओलांडण्यासाठी पूल नसल्यामुळे डोंगर उतरून दरीत नदीवर तात्पुरते ठेवलेले लाकडी ओंडके, पूल, नदीतील खडक इत्यादीवरून चालत जाऊन नद्या ओलांडाव्या लागतात. पुन्हा डोंगर चढून व उतरून दुसरी नदी ओलांडावी लागते.

हे सारे टाळण्यासाठी आम्ही सीमाला न जाता शॉर्ट कटने जंगलातून सरळ हनुमानचट्टीला जायचे ठरवले.
हा अत्यंत अवघड रस्ता होता. एक-एक पाऊल टाकणे कठीण झाले असूनही मध्ये थांबणे शक्य नसल्यामुळे चालतच राहावे लागते. मात्र, दोन्ही बाजूच्या खोल-खोल दऱ्या, हिरवे उंच डोंगर, खालून जाणारे ढग, मध्येच दिसणारे फुलांचे ताटवे या स्वर्गीय वातावरणात देहभान हरपते.





संध्याकाळी हनुमानचट्टीला पोचल्यावर अंगात त्राणही उरले नाही. टायगरची ते अशी अवस्था झाली होती.



सातवा दिवस

हनुमानचट्टीपासून जानकीचट्टी १० किमी अंतरावर आहे. इथे बसची सोय आहे पण आम्ही मात्र हे अंतरसुद्घा चालत जायचे ठरवले. इथूनच घोड्यावरूनसुद्धा पुढे जाता येते.



शेवटी समारोप म्हणून ‘यमुनोत्रीचा’ सहा कि.मी. ट्रेक केला. हा संपूर्ण रस्ता क्राँक्रिटच्या पायऱ्यांचा असून अरुंद आहे. त्यातच घोडे, पिट्टू, पालख्यांची गर्दी असते.



इथून पुढे वाहने जात नाहीत. भाविकांना हा ट्रेक करावाच लागतो. या वाटेवर बसण्याची, पिण्याच्या पाण्याची उत्तम सोय आहे.



यमुनोत्री



यमुनोत्री मंदिरात यमुनेची सावळी आणि गंगेची गोरी मूर्ती आहे. जणू यमुनेवरचे राधा-कृष्णच...
मंदिराच्या मागे गरम पाण्याची कुंड आहेत. या कुंडांमुळेच या स्थानाला हे महत्व मिळाले आहे.

आठवा दिवस

जानकीचट्टीच्या मुक्कामात आम्हाला समजले की यमुनोत्री मार्गावर अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या आहेत. आणि मार्ग बंद होण्याच्या वाटेवर आहे. पण परत जायला कोणतीही गाडी मिळत नव्हती. कशीबशी गाडी मिळली पण ती सुध्दा दरड कोसळल्याने हनुमानचट्टीपर्यंत येवू शकली नाही. मग पुन्हा ट्रेक सुरु झाला. घाटातून परत ६ किमी चालून आम्ही राणाचट्टीला पोचलो. इथे तर १०-१२ मीटर रस्ताच खचला होता.



राणाचट्टीवरून बारीकोट - नौगाव मार्गे देहरादूनला जायचे होते. इथे परत नवी गाडी मिळण्याला बराच वेळ गेला. राणाचट्टी ते बारीकोट हे ४० किमी अंतर पार करायला आम्हाला तब्बल ६ तास लागले. का? फोटोत पहा.



या ४० किमी रस्त्यकिमी सुमारे १० किमी सलग दरड कोसळली होती. बराचसा रस्ता साफ केला असला तरी दगड, चिखल यातून वाट काढत जाणे फार जोखमीचे होते.



नौगाव देहरादून मार्गसुद्धा घाटाचाच. रात्री उशीरा देहरादूनला पोचलो. तेव्हा कुठे थोडे बरे वाटले.

टीपः भटकंतीचा खूप अनुभव नसेल तर शक्यतो पावसात हिमालयातील ट्रेक टाळलेलेच चांगले.

Wednesday, August 11, 2010

ओझर्ड्याचा अजस्र धबधबा

कोयनानगरहून 'नवजा'ला जाताना कोयनानगरपासून ९ किमी अंतरावर ओझर्ड्याचा मोठा धबधबा आहे.
१ ऑगस्टला इथे गेलो होतो.

इथे जाताना अजून दोन मोठ्ठे धबधबे लागतात. पण यांच्या मोहात फार न पडलेलंच बरे... कारण खरे आकर्षण तर पुढे आहे.

(धबधबा क्र. १)





(धबधबा क्र. 2)



उजव्या बाजूला पसरलेला 'शिवाजी सागर'...



वळणावळणाचा रस्ता मागे टाकत आपण मुख्य धबधब्याला पोचतो. याला 'पंचधारा' असेही म्हणतात. का ते खालच्या फोटोवरून समजेल. :)




धबधब्याच्या डाव्याबाजूने एक वाट जाते, ती थेट त्याच्या तळाशी, जिथे वरून जोरदार पाणी पडत असते तिथे घेउन जाते.



वाटेवरून दिसणरे फेसाळते पाणी



पंधरा-वीस मिनीटे चालल्यावर आपण धबधब्याच्या तळाशी पोचतो. इथं पोचल्यावर जे काही वाटते त्याचे काय वर्णन करावे...पूर्ण वेळ धबधब्याचे पाणी वरून पडत असते, तुषार तर इतके असतात की वरून पडणारे पाणी पाहाताना डोळे उघडेच राहात नाहीत.






कितीही काळजी घेतली तरी सोबत आणलेले सगळे काही इथे भिजते... तेव्हा काळजी सोडावी आणि मनसोक्त भिजावे. :)